प्रकाशकाच्या पीठावरून-

“सौख्या”ला पर्याय

एक सोपा आचार आपल्या जाणिवेला अंतर्भूत करतो, आपल्या जीवनातल्या दुर्गम आनंदांना उपभोगू देतो आणि सर्व परिस्थितीत समाधानी असू देतो.

English |
Marathi |
Spanish
|Tamil

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

“तुमचे जीवन सुखाचा पाठलाग करण्यावर केन्द्रित आहे काय?” असा प्रश्न विचारला तर अनेक लोक सहज त्याचे “होय” म्हणून उत्तर देतील. आणि “तुम्हाला सुख सापडले का आणि ते तुम्ही टिकवून ठेवले आहे काय?” हा प्रश्न विचारला तर तेच लोक कदाचित् “नाही” असे कबूल करतील. सुखाच्या क्षणभंगुरतेचे हिंदु धर्म आवर्जून विलोकन करतो. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, असे म्ह्णाले: “खरे सौख्य् आणि स्वातंत्र्य बाह्य जगांत सापडू शकत नाही, कारण, भूतलावरील सुख दुःखाशी अनुद्धारितपणे बांधल्या गेले आहे आणि स्वातंत्र्य बंधनाशी निगडित आहे.”

मुंडक उपनिषद हे सत्य (३.११.१-२) एका कथेत प्रस्तुत करते. “दोन पक्षी, सदैव एकत्र असणारे आणि एकाच नावानी ओळखल्या जाणारे, एका झाडावर एकमेकांच्या जवळ बसतात. त्यापैकी एक त्या झाडाचे गोड फळ खातो, आणि दुसरा केवळ न खाता बघतो.” फळाचा आस्वाद घेणारा पक्षी आहे जीवात्मा, शरीर धारण केलेला आत्मा, आणि केवळ बघणारा पक्षी आहे परमात्मा, ईश्वरी आत्मा. कथा पुढे जाते “फळ आनंदाने चाखतांना पहिला पक्षी त्याच्या मर्यादित शक्तीने गोंधळून जाऊन विव्हळतो. परन्तु तो जेव्हा दुसर्‍या पक्ष्याला, तेजोमय परमात्म्याला बघतो, तेव्हा तो दुःखापासून मुक्त होतो.”

या ऋचांमध्ये वेद आपल्या सुखदुःखाच्या, आपण आपले जीवन स्वाभाविक/मानसिक अनुभवाने जगण्याचा, चक्रावर मात करण्याचा मार्ग दाखवतात. आपल्या अंतर्भूत देवत्वाची जाणिव प्राप्त करून आणि आध्यात्मिक चेतनेने आपण यावर विजय प्राप्त करू शकतो. परमगुरु योगस्वामी याचे एका नात्चिंतनाई गीतात असे वर्णन करतात: “सुख आणि दुःख दोन्ही माया आहेत. आत्मन्, प्रेमापासून कधीच दूर नसलेले, प्रत्यक्ष ज्ञानाचे रूप आहे. म्ह्णून ही दोन (सुख आणि दुःख) तुम्हाला कधीच स्पर्श करणार नाहीत. मृगजळ पृथ्वी धुवून काढू शकते काय? सर्वज्ञ, कृपाळू, खर्‍या गुरुच्या पवित्र पदकमलांचा आश्रय घेऊन आपल्या शक्तीच्या मर्यादेपर्यंत पोहोचून तुमचे हृदय कोमल होऊ द्या आणि विरघळू द्या.”

अशी कल्पना करु या की आपण आपल्या स्वतःच्या, आध्यात्मिक प्रकृतीत प्रवेश करू शकतो. आणखी अशी कल्पना करा की यात्रा चार पायर्‍यांची आहे. या चार पायर्‍या पार केल्यानंतर आपण एका अमर्याद अंतरिक्षात, शुद्ध प्रज्ञानात आणि त्याच्या उगमात विलीन झालो आहोत असे आढळून येते. ही एका अत्यंत गाढ समाधीची स्थिति आहे. यातील तीन पायर्‍या एका आत्मतेजाकडे घेऊन जातात आणि देवदेवतांच्या व ऋषिमुनींचे दिव्य दर्शन शक्य करतात. दोन पायर्‍या सर्व प्राणीमात्रांवर दिव्य प्रेम करण्याच्या स्तरावर पोहोचवतात आणि एक पायरी समाधानी, सर्जनशील आणि अंतर्ज्ञानी या स्तरावर पोहोचवते.

प्रथम आपण या दुर्मिळ स्तरांवर पोहोचू शकत नाही म्हणून या चार, तीन किंवा दोन सुद्धा पायर्‍या पार करणे आपल्याला हताश करू शकते. म्हणून त्याचा एक व्यावहारिक मार्ग हा आहे की आपल्या प्रातःकाळच्या साधनेच्या वेळी पहिली पायरी पार करावी आणि त्यात प्राप्त झालेली सर्जनशील जाणीव दिवसभर कायम ठेवावी. पुढच्या इतर पायर्‍या आपले भविष्यकाळतले प्रभुत्व प्राप्त होण्यास तयार असतातच.

चक्र

आपल्या या चार पायर्‍यांच्या समानतेचा चक्रांशी सरळ संबंध आहे. ही चक्रे मज्जातंतुच्या गुंडाळ्यांचे किंवा शक्तीचे केन्द्र आपल्या अंतर्शरीराच्या पाठीच्या कण्यात असतात. अशी सात प्राथमिक चक्रे असतात. यापैकी प्रथम तीन, लोककथेतल्या झाडाच्या गोड फळांचा आस्वादाचा अनुभव घेणार्‍या पक्षाप्रमाणे, स्वाभाविक/बौद्धिक मनाशी संबंधित आहेत. पहिले चक्र, मूलाधार चक्र, (जे मेरुद्ण्डाच्या पायथ्याशी असते), आपल्या स्मरणशक्तीचे नियंत्रण करते. दुसरे चक्र, स्वाधिष्ठान चक्र, (जे नाभीच्या खाली असते), विवेकबुद्धीचे नियंत्रण करते. तिसरे चक्र आहे मणिपूर चक्र, (जे नाभीच्या जागेजवळ असते), ते इच्छाशक्तीचे केन्द्र आहे. अंतःकरणात फार खोल न जाता या तीन चक्रांच्या क्षेत्रात आपले दैनंदिन जीवन यांच्यापलिकडले काहीही न अनुभवता साहाजिक राहता येते.

चौथे चक्र, अनाहत (हृदयाजवळ), प्रत्यक्ष अनुभवाचे केन्द्र आहे. या चक्रात आपण पहिली पायरी चढून अंतःकरणाचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या धर्मग्रंथात याचे “हृदयकमल” असे वर्णन केलेले आहे.

पाचवे चक्र, विशुद्ध (गळ्यामध्ये), दैवी प्रेमाचे चक्र, याचा अनुभव आपण दुसरी पायरी चढल्यावर घेतो. साहावे चक्र, आज्ञा, (तिसर्‍या डोळ्याच्या जागी), दैवी दृष्टीचे केन्द्र, याचा अनुभव तिसरी पायरी पार केल्यावर येतो. सातवे चक्र, सहस्रार, (डोक्याच्या सर्वोच्च जागी) साक्षात्काराचे आणि देवत्वाचे केन्द्र, याचा अनुभव, आपण चौथी पायरी पार केल्यानंतर येतो.

पहिल्या पायरीवर, अनाहत चक्रात प्रवेश करून आपण काय अनुभवतो याचा विचार करु या. गुरुदेव याचा सर्व प्रकारचे कलाकार, संशोधक, निर्माते, यांचे क्षेत्र असल्याचे वर्णन करतात. जेव्हाजेव्हा तुम्ही काही नवीन रूपरेखा तयार करता, किंवा निर्माण करता, तेव्हा तुमच्यात समावलेले सौंदर्य तुमच्या मज्जासंस्थेच्या माध्यमातून प्रगट करत असता. हे एक सुंदर ठिकाण आहे, जेथे आपल्याला आपल्या पाठीच्या कण्याच्या शक्तीचा अनुभव येतो. ज्या क्षणी तुम्हाला या प्रफुल्ल शक्तिचा अनुभव येतो, त्या क्षणी तुम्ही तुमच्या स्वाभाविक/बौद्धिक चेतनेचा त्याग करता आणि अंतस्थ चैतन्यात उड्डाण घेता.

श्वासाचे काही मिनिटे केलेल्या नियंत्रणाने या मेरुदण्डातल्या शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल. याचे एक सोपे तंत्र आहे ते असे: नऊ पर्यंत मोजून श्वास घ्यायचा, एक मोजून रोखून धरायचा, पुन्हा नऊ पर्यंत मोजून उच्छ्वास करायचा आणि पुन्हा एक मोजून श्वास धरायचा. या प्रकारचे प्राणायाम काही मिनिटे करून आपला मेरुदण्ड आणि त्यातील शक्ति यांची जाणीव होऊ द्या. आपल्या मनःचक्षूपुढे असे बघा की मेरुदण्डाच्या मध्यभागी असलेल्या एक स्वच्छ नलिका आपल्या डोक्याच्या शिखरातून येणार्‍या पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने भरली आहे. त्यानंतर हा प्रकाश, हे शुद्ध जीवन प्राबल्य मेरुदण्डात प्रवाहित होऊन बाहेर मजासंस्थेत जातो आहे असा अनुभव घ्या.

आह्वाने-

समाधान, सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञान यांच्या जाणीवेने आपला दिवस सुरु केल्यानंतर लवकरच आपल्याला यापासून मिळालेली सुरक्षता गमावून जाण्याचे मार्ग दिसू लागतील. अंतःकरणात एक पायरी घेऊन आपल्याला मिळालेली ही दिव्य अवस्था आपण कशी कायम करू शकतो? हिंदु धर्मातील नैतिक तत्त्वे, यम, पाळणे ही याची अत्यंत मूलभूत आवश्यकता आहे. अधर्मिक कार्ये, उदाहरणार्थ्, असत्य बोलणे आणि दुसर्‍यांना दुखवणे, मन आणि भावना विचलित करतात आणि आपल्याला बाह्य जाणिवेच्या वादळात खेचून नेतात.

मतभेदांचे वादात रूपांतर न होऊ देणे हे ही महत्वाचे आहे. मतभेद साहाजिकच आहेत, पण ते हुशारीने आणि एकोप्याने हाताळले पाहिजेत. आपण मतभेदाचे संघर्षात रूपांतर न होऊ देण्यासाठी तडजोड करायला नेहमी तयार असायला पाहिजे. घरगुती वादविवाद सर्वाधिक अस्थिरता निर्माण करणारे असतात. या कलहाचे मुख्य कारण आहे की मन मोकळे करायला, दिवसभरच्या कामावर किंवा शाळेत जमा झालेल्या निराशेला व्यक्त करण्याला घर हे साहजिक स्थान आहे ही गैरसमजूत. परन्तु, साहचर्यासाठी आपण हा उपक्रम बदलायला हवा आणि त्याऐवजी घर हे पूर्ण कुटुम्बासाठी एक अभयस्थान आहे, जेथे आपल्या भावनांनी इतरांना संतप्त करण्याचे स्थान आहे असे कधीही न मानणे असे विचार परिवर्तन करायला हवे. गुरुदेवांनी आग्रहाने सांगितले की घरी कार्यालय, कारखाना किंवा निगमी कामाच्या जागेपेक्षा वरच्या दर्जाचे आदर्श योजिले पाहिजे. घरी संघर्ष टाळण्यासाठी आपला तणाव दूर करण्यासाठी आपण दुसरे उपाय करू शकतो: उद्यानातून किंवा (समुद्र, नदी) तीरावर पायी फिरायला जाणे, योगाच्या किंवा व्यायामशाळेच्या वर्गात जाणे किंवा घरी परत जातांना देवळात थांबून प्रार्थना करणे.

तृप्ती आणि कृतज्ञता:

दररोज आपल्यावर ज्या काही वस्तुंची जाहिरात करीत असतील ती वस्तु आपण घेतली तर आपल्याला अधिक सुख मिळेल अशी आश्वासने देणार्‍या जाहिरातींचा भडीमार होत असतो. सतत भुरळ पाडणार्‍या जाहिरातींमुळे समाधानी जाणीव असू देणे हे एक मोठे आह्वान होते. देखणे नवीन वाहन (car), शीघ्रतर संगणक, आकर्षक वस्त्रे, सर्व या सुख नावाच्या सदा चुकविणार्‍या मनस्थितीची प्राप्ति करून देण्याची आश्वासने देत असतात. या खोट्या आकर्षणावर मात करायला आपण आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधान मानून घेण्याचा दृष्टिकोन ठेवू शकतो. आपण काही अधिक मिळवले तर ते आपण आपल्याला अधिक सुखी करेल असा विचार न करता त्याने आपल्या सर्व कुटुंबाला योग्य दृष्टीने फायदा होईल या कारणाने मिळवू.

कृतज्ञता हे या आतल्या जाणीवेचे महत्वाचे अंग आहे. आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद प्रदर्शित करणे ही एक कृतज्ञतेची किल्ली आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपल्या पाठशाळेसाठी, आपण राह्तो त्या घरासाठी, आपल्या बुद्धीसाठी आणि आपल्या धर्माच्या प्रथेसाठी आभारी आहोत.

“मी आत्ता ठीक आहे”

गुरुदेवांनी “शिव सायुज्जम्” या ग्रंथात दिलेले रूपकात्मक साधन “मी आत्ता ठीक आहे” या दृढीकरणाचा आपल्या आतल्या जाणीवेला कायम करण्यास मदत होते. भूतकाळाबद्दल पश्चात्ताप नाही, भविष्यकाळाची काळजी नाही अशा वर्तमानकाळी पूर्णत्व वाटणार्‍या या क्षणाच्या अनंतकाळात राहण्याचा हा मार्ग आहे. ही अत्युत्तम कृति तुम्ही दिवसातून आत्ता आणि अनेकदा करू शकता. याची सवय करतांना स्वतःला हा प्रश्न विचारा: “मी आत्ता या क्षणी ठीक नाही काय?”, आणि त्याचे उत्तर द्या: “मी आत्ता ठीक आहे”. ही प्रश्नोत्तरी तुम्हाला उत्तम, आत्मविश्वासू, आणि अनाहत चक्रात स्थापन होत पर्यंत करत राहा.

या जगाकडे आपण आपल्याला सुख देणारे असे पाहतो, तेव्हा आपले जीवन हे भावनांच्या चढउतारावरून सतत जाणारे असते. आपली तृप्ति आपण आपल्या अंतःकरणातून मिळवतो तेव्हा आपले जीवन आनंदमय असते आणि तो आनंद आपण इतरांबरोबर वाटून घेऊ शकतो.