Read this article in:
English |
Spanish |
Hindi |
Gujarati |
Tamil |
Marathi

हिंदुधर्माची तत्वे आणि प्रथा बालकांना आणि तरुण मंडळींना बहुतांशी जीवनोपयोगी उपकरणाऐवजी बंधनकारक नियम आहेत अशा प्रकारे समजावून देण्यात येतात. नियम आपल्या जीवनावर बंधने घालतात आणि आयुष्यातील घटनांची आनंददायकता कमी करतात. लहान मुले, विशेषतः, अशा अनेक नियमांविरुद्ध बंड करतात. परन्तु उपकरण म्हणून वापरलेले नियम अधिक गुणकारक ठरतात आणि आपले जीवन सुखकारक करतात.
ह्या क्लेशकारक नियमांचे आकर्षक उपकरणांत रुपांतर आपण त्या प्रथेचे किंवा आचाराचे व्यवस्थित स्पष्टीकरण करून आणि त्यांपासून काय फायदे होतात हे सांगून करू शकतो. आपल्या अपत्याचे चित्त आकर्षित करून, हिंदुधर्म अध्यात्ममार्गावर प्रगति करायला, आणि एका सुखी आणि यशस्वी जीवनसाठी कसा मदत करेल हे दाखवणे हा यामागे हेतु असतो. प्रेरणा, प्रोत्साहन, लोकांना प्रगतीची पाउले पुढे टाकण्यास मदत करतात. मुले या नियमाला अपवाद नाहीत.
कल्पना करा: एक बालिका आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबाच्या प्रथांबद्दल या तीन प्रश्नांचे उत्तर देण्याचे आव्हान देते: आपण शाकाहारी कां? आपल्याला दर आठवड्याला देवळांत जाणे कां आवश्यक आहे? “Hip hop” संगीत ऎकण्याची माझ्या मित्रमैत्रिणींसारखी मला कां परवानगी नाही? दुर्दैवाने आईवडिल अशा प्रश्नांची नीट विचारपूर्वक पूर्ण उत्तरे देण्यासाठी वेळ खर्च न करता या परिस्थितीतून सोपा मार्ग काढून म्हणतात की “आपल्या घरी आपण असेच वागतो.” त्यांच्या मित्रमैत्रिणींना वर्तणुकीचे असे कडक नियम पाळायचे नसल्यामुळे असे उत्तर ऎकणार्‍या मुलांचा असा समज होऊन जातो की हिंदुधर्म म्हणजे आपले जीवन बंधनकारक आणि दु:खी करण्यार्‍या नियमांचा संग्रह. या प्रश्नांच्या उत्तरांचे बंधनकारक नियमांपासून सुखदायी उपकरणांत रुपांतर करण्यापूर्वी आपण काही मूळ कल्पनांचे पुनर्दर्शन करुया. मी त्यांना म्हणतो: “भव्य कल्पना”

दोन भव्य कल्पना

प्रथम भव्य कल्पना ही की सर्व अनुभवांचा आपल्या अंत:करणावर परिणाम होतो. माझ्या गुरुंचे गुरु, श्रीलंकेचे योगास्वामी, यांनी याचे स्पष्टीकरण केले ते असे: तुम्ही ज्याचे चिंतन करता, ते तुम्ही होता. तुम्ही परमेश्वराचे चिंतन कराल, तर तुम्ही परमेश्वर व्हाल. तुम्ही खाद्यपदार्थांचा विचार कराल तर खाद्य व्हाल. सर्वच गोष्टींचा मनावर परिणाम होतो.
द्वितीय भव्य कल्पना ही की प्रत्येक व्यक्ति म्हण्जे या जड शरीरांत वास्तव्य करणारा एक आत्मा आहे. आणि आपल्याला त्रिविध स्वभाव गुणधर्म आहेत. गहनोत्तम पातळीवर आपण एक शुद्ध, देदीप्यमान, परमानंदी आत्मा आहोत. हा आपला अंतर्ज्ञानी किंवा आध्यात्मिक स्वभाव आहे. तसेच आपल्याला बौद्धिक आणि उपज्ञानी स्वभाव आहेत. याप्रमाणॆ आपल्या स्वभावाचे तीन पैलू आहेत: आध्यात्मिक, बौद्धिक आणि मानसिक. मानसिक स्थरावर प्राणीमात्रांचे स्वयंसंरक्षण, प्रजोत्पादन, क्षुधा आणि तृष्णा या गुणांचा समावेश होतो. त्यांतच लोभ, द्वेष, क्रोध, भय, काम, आणि मत्सर या भावनांचाही समावेश होतो. हा आपला मानसिक, भाविक स्वभाव आहे.

बौद्धिक पातळीवर आपल्याला सारासार आणि सतर्क विचार करण्याची शक्ति आहे. नीरक्षीरविवेकबुद्धिचा हा उगम आहे. अंतर्ज्ञानी स्तरावर सर्वज्ञ, सर्वजागृत, शुद्ध चैतन्य, सत्य आणि प्रेम यांचे अस्तित्व जाणवते. हा आपला आध्यात्मिक स्वभाव आहे.
या दोन कल्पनांचे सहाय्य घेऊन आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत.

आपण शाकाहारी कां आहोत?

भारतांत शाकाहार व्यवस्थित स्थापित झालेला आहे आणि मांसाहार न करणॆ हा क्वचितच टीकेचा विषय ठरतो. इतर देशांत मात्र शाकाहार अपवाद असतो आणि शाकाहारी मुलांना उपहासाला तोंड द्यावे लागते, बरोबरीच्या मित्रमंडळीच्या दबाव आणि नापसंती यांना तोंड द्यावे लागते. शिवाय या अपमानांत अपकाराची भर म्हण्जे बहुतांश शाळांच्या भोजनालयांत आणि सामाजिक समारम्भात शाकाहारी पदार्थाची उपलब्धता अकल्पनीय आणि अनारोग्यकारक असूनही कमीच असते. शाकाहारी विद्यार्थ्याला खाण्यासारखे तेथे जवळजवळ काहीच नसते.

यामुळे बालबालिका सोपा मार्ग काढतात आणि शाकाहार सोडून देतात. तथापि, शाकाहारी राहण्यासाठी काही महत्वाची कारणे आहेत. त्यांत मुख्य कारण हे की मांसाहाराने आपल्या चैतन्यावर वाईट परिणाम होऊन आपली वृत्ती खालच्या मानसिक पातळीवर येते.
मुलांना समजावून सांगा की जर त्यांना उच्च स्तरावरील चैतन्यावस्थेत, त्यांच्या आत्मस्वभावावस्थेत राहावयाचे असेल, शांति, सुख, प्रेमसंपन्न जीवन हवे असेल तर त्यांनी मांस, मासे, खुर (shellfish), कोंबडे, किंवा अंडी खाणे उचित नाही. कारण हे की प्राणीजन्य खाद्यपदार्थांत असलेल्या रसायनांचे भक्षण केल्याने आपण आपल्या शरीरांत आणि मनांत क्रोध, मत्सर, भय, चिंता, संशय, मृत्यूचे महाभय, हत्येला बळी पडलेल्या प्राण्याच्या मांसात जीवनरसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे अटकलेल्या या सर्व भावना आपल्या शरीरात प्रवेश करतात.

वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे मांसाहाराने आपल्या मानसिक वृत्तींची वृद्धि होते आणि आपल्या या हीन भावनांच्या दिशेने मन प्रवृत्त होते. मांसाहाराने क्रोध येणे नेहमीपेक्षा वाढेल आणि मलिन वृत्तींचा अनुभव येईल. माझे गुरु म्हणाले: शाकाहार अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या माझ्या उपाध्यायत्वात हे प्रकट झाले आहे की शाकाहारी कुटुम्बात मांसाहारी कुटुम्बापॆक्षा फारच कमी प्रश्न उद्भवतात. जगभर ज्या मुलांना याची प्रचिति येत आहे ती मुले स्वत:हून शाकाहारी होऊ लागली आहेत. आणि आजकाल, GPS-enabled iPad, च्या मदतीने आणि थोड्याशा कौशल्याने शाकाहारी पदार्थांची उपलब्धता जवळ्जवळ कोठेही शोधून काढता येते.

आपण दर आठवड्याला देवळांत कां जायला हवे?

देवळांत जाणे ही हिंदुधर्माची एक प्रथा आपल्या आत्मिक स्वभावाशी संबंध प्रस्थापित करून आत्मानंदाचा अनुभव प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे मुलांना समजावून सांगा. ते देवळांत असंतुष्ट मनाने जाऊ शकतात. तेथे देवाचे किंवा देवांचे आशीर्वाद मिळवून आनंदीत मनाने परत जाऊ शकतात. हे कसे शक्य आहे? देवतांचे आशीर्वाद त्यांचे मन शुद्ध करतात आणि मनांत साठवलेल्या विचारांपासून आणि भावनांपासून मुक्त करून आपल्या अंतरात्म्याशी संपर्क पुनः प्रस्थापित करू देतात. देवतांचे आशीर्वाद त्यांना त्यांच्या मानसिक स्वभावातून उचलतात, बौद्धिक स्वभाव सौम्य करून आपल्या आत्मिक स्वभावाजवळ पोहोचवतात.
एकदा मुलांना कळले की देवालयांत जाऊन केलेली पूजा त्यांच्या उद्वेगित मनाला शांत करून भावना स्थिर करण्याचे एक उत्तम साधन आहे, तेव्हा त्यांची आपल्या कुटुम्बाबरोबर देवळात जाण्याच्या अनिच्छेचे परावर्तन होईल. मंदिर फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर त्यांच्या स्वतःसाठीही महत्वाचे होईल. देवालयातील पूजा शांत राहण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत मन केन्द्रित करण्यास मदत करेल. त्यांच्या लक्षांत येईल की योग्य मनःस्थितीने देवालयांत जाणे म्हणजे स्वतःला सावरण्याचा मार्ग आहे. देवालय हे दीर्घकालीन दु:खदायक भावनांचे उपशमन करण्याचे स्थान आहे.
मुलांना देवळांत जाऊन देवतेच्या चरणी आपले सर्व प्रश्न अर्पण करायला, देवतांना वाहायला उपचारद्रव्य न्यायला, आणि देवतांशी आपल्या दुःखाविषयी बोलायला, जणुकाही ते या भौतिक जगांत आपल्या मित्राशी बोलत आहेत असे बोलायला शिकवा. तेथे जर ते आपले मन योग्य प्रकारे उघडतील तर ते देवतेबरोबर एक गूढ अंतर्भूत क्रियाकर्म करतील आणि देवतेचे आशीर्वाद मिळवतील. त्यांच्या लक्षांत येईल की जेव्हा ते मंदिरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांना त्यांचा प्रश्न आठवत नाही. हे एक त्यांच्या यशाचे चिन्ह आहे.
अर्थातच, देवालयांत दर आठवड्याला जाण्याचा फायदा फक्त आपण मन उद्विग्न असतांनाच होतो असे नाही. आयुष्यात सर्व व्यवस्थित चालू असतांना देखील मनोभावाने आणि लक्षपूर्वक पूजन केल्याने त्यांचे मन स्वतःच्या आत्मरूपाकडे घेऊन जाते.
आपली मुले अधिक दयावंत आणि समंजस होतील. आयुष्यात येणार्‍या सर्व आव्हानांना ते योग्य रितीने हाताळू शकतील.
मी hip hop संगीत कां नाही ऎकू शकत?

विशेषत: दीर्घ काळ संगीत ऎकल्याने त्याचा आपल्या चैतन्यावर फार गंभीर परिणाम होतो. मुले जे ऎकतात त्याप्रमाणे ते एका जागृत अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जातात. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी या बाबतीत अगदी स्पष्टवक्ते होते. त्यांचे असे मत होते की घरांत चालू असलेले संगीत आणि त्याने दिलेला निर्देश फार महत्वाचे आहेत. त्यांनी असे विधान केले की हीनमनोवृत्तिप्रदर्शक संगीत आणि पद्य यांवर कटाक्षाने लक्ष ठेवून ते वर्ज करावे. बेकायदा कैफावर आधारित ही “संस्कृति” आणि तिचे आसुरी संगीत हे दोन्ही मानवी जीवनाच्या मूलभूत प्रकृतिचा नाश करतात. (“The drug culture and its demonic music erode the very fabric of human character and culture.”) तुमच्या मुलाला ही कल्पना कळली तर त्याच्या/तिच्या संगीताच्या आवडीनिवडीचे विस्तारण होईल, तुम्ही केलेल्या नियमांमुळे नव्हे, तर, तुमच्या अपत्यालाच या संगीताचा मनावर काय परिणाम होते हे समजल्यामुळे. कमीतकमी आपले अपत्य अत्यंत हीन व्यतिरेकी संगीत टाळायला लागेल आणि त्या प्रकाराच्या संगीतातील फक्त उच्च दर्जाचे संगीत ऎकेल. खरे तर, घरांत सुरु असलेले पारंपारिक वाद्यांवर वाजविलेले सुमधुर संगीत, जे ऎकून कुटुम्बातील सर्वच लोकांचे अंतःकरण सुसंस्कृत होईल, असेच असावे.

लक्षात असू द्या की नियमापेक्षा उपकरणे जास्त प्रभावी असतात

आपल्या अपत्याच्या सर्व प्रश्नांची युक्तार्थ उत्तरे देण्याचा वेळ काढून प्रयत्न करणे नक्कीच हितकारक आहे. कुठल्याही प्रथेचा किंवा नियमाचा आपल्या चित्तावर कसा परिणाम होतो त्याचे पूर्ण स्पष्टीकरण करा. त्यामुळे ती प्रथा किंवा तो नियम उत्साहाने आचरणात आणण्याची शक्यता मोठ्या प्रमाणाने वाढते. आणि कदाचित्‌ आपले अपत्य प्रेरणा मिळाल्याने इतर हिंदु युवकयुवतींना या प्रथांचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन देईल!